Monday, December 11, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ⑦

याच काळात पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला भेट देऊन आले होते. त्यांचा रशियावरचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी स्थापन झालेल्या लेनिनग्राड येथील एका संस्थेविषयी लिहिले होते. हा मजकूर वाचून धर्मानंदांना सोविएत रशियाला जाण्याची इच्छा झाली. त्यांनी जवाहरलालजींना पत्र लिहून त्यांचा सल्ला विचारला. त्यास आलेल्या उत्तरात "आपण रशियाला अवश्य जावे, तेथील अनुभव फार उपयोगी पडतील" असे त्यांनी लिहिले होते. सोबत संपर्क साधण्यासाठी पत्ताही पाठवला. धर्मानंद सोविएत रशियाला गेले. रशियातील 'अॅकॅडमी ऑफ सायन्सेस', लेनीनग्राड विद्यापीठ येथे त्यांनी पाली भाषा शिकवण्याचे काम केले. मॉस्को व इतर शहरांना भेटी दिल्या. एक वर्ष रशियात राहून धर्मानंद भारतात परतले.

आचार्य धर्मानंद कोसंबी

१२ मार्च १९३० रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहास सुरुवात झाली. धर्मानंदांनी सत्याग्रहात भाग घेण्याचे ठरवले. शिरोड्याच्या मीठ सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना कैद होऊन लगेच सोडून देण्यात आले. त्यानंतर धर्मानंद शिरोड्याहून विलेपार्ले येथील छावणीत आले. मुंबईतील कामगार वर्गात सत्याग्रह चळवळीचा प्रसार झाला नव्हता. काँग्रेसच्या मुंबई प्रांतिक कमिटीने हे काम धर्मानंदांना दिले. पुढे धर्मानंदांकडे पार्ला छावणीचे प्रमुखपद आले. छावणीवर छापा पडून धर्मानंद स्वयंसेवकांसह पकडले गेले. यात अटक होऊन त्यांना एक वर्षाची सक्तमजुरी व दोनशे रुपये दंड आणि हा दंड न दिल्यास आणखी तीन महीने कैद अशी शिक्षा झाली. त्यांना ठाण्याच्या तुरुंगात पाठवले गेले. परंतु, उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने काहीच दिवसात धर्मानंदांची सुटका झाली.

Sunday, November 19, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ⑥

धर्मानंदांची पुण्यातील या वास्तव्यात महात्मा गांधीजींशी पहिल्यांदा भेट झाली. आचार्य कृपलानी एकदा पुण्याला आले होते. त्यावेळी काकासाहेब कालेलकर यांच्यामुळे धर्मानंदांची आचार्य कृपलानी यांच्याशी ओळख व पुढे मैत्री झाली होती. पुढे १९१६ साली गांधीजी पुण्याला आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर कृपलानीही होते. याच वेळी कृपलानी यांनी धर्मानंदांची गांधीजींशी भेट घडवून आणली.

महात्मा गांधी

पहिल्या अमेरिका भेटीत ‘विशुद्धीमार्ग’ या बौद्धग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे ते काम तडीस नेण्याच्या उद्देशाने हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. जेम्स वुड्स हे धर्मानंदांना पुन्हा अमेरिकेस येण्यासाठी पत्राद्वारे आग्रह करत होते. विशुद्धीमार्गाचे काम पूर्ण करण्याची ही छान संधी आहे असे समजून धर्मानंदांनी सहा वर्षांनंतर दुसर्‍या वेळेस अमेरिकेला जाण्याचे ठरवले. फर्ग्युसन कॉलेजने त्यांना कॉलेज सोडून जाऊ नये म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पगार इतर सभासदांइतका १०० रुपये करण्याचीही तयारी दर्शवली. अखेर कॉलेजने त्यांचा राजीनामा न स्वीकारता त्यांना दोन वर्षाची बिनपगारी रजा दिली.

Friday, November 03, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ⑤

पुण्यात येऊन धर्मानंदांना एक वर्ष होत आले होते. एके दिवशी डॉ. जेम्स वूड्स यांचे अमेरिकेहून धर्मानंदांना निकडीचे पत्र आले. त्यात लिहिले होते की, "हार्वर्ड विद्यापीठात माजी प्रोफेसर वारन यांनी चालवलेल्या 'विशुद्धीमार्ग' या बौद्ध ग्रंथाची चिकित्सक आवृत्ती तयार करण्याच्या कामी तुमच्या मदतीची गरज आहे. त्वरित येण्याची कृपा करावी." 

आचार्य धर्मानंद कोसंबी

धर्मानंदांनी अमेरिकेस जाण्याचे ठरवले. श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांकडून जाण्याची परवानगी घेतली. धर्मानंद इंग्लंडमार्गे अमेरिकेला जाण्यास निघाले. वाटेत इंग्लंडमधील मुक्कामात एका डच व्यापार्‍याने धर्मानंदांना कार्ल मार्क्स व समाजवादी तत्वज्ञान याची माहिती करून दिली. धर्मानंद त्याबद्दल अनभिज्ञ होते. पुढे अमेरिकेत पोहोल्यावर विविध लेखकांनी समाजवादावर लिहिलेले अनेक लेख व पुस्तके धर्मानंदांनी वाचली. जॉन स्पार्गो यांनी लिहीलेल्या कार्ल मार्क्स यांच्या चरित्राचा त्यांनी अभ्यास केला. हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर वारन यांच्या मृत्यूमुळे विशुद्धीमार्ग या बौद्ध ग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीच्या कामाची जबाबदारी प्रोफेसर ल्यानमन यांनी घेतली होती. धर्मानंदांनी त्यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली. परंतु, प्रो. ल्यानमन यांच्या आडमुठेपणामुळे विशुद्धीमार्गाचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. त्यामुळे अखेर दोन वर्षे अमेरिकेत काढून धर्मानंद भारतात परतले.

Saturday, October 28, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ④

औद्योगिक परिषदेचे अध्यक्ष या नात्याने बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड एकदा कलकत्त्याला आले होते. त्यावेळी धर्मानंदांनी त्यांची भेट घेतली. महाराजांनी त्यांना चर्चेसाठी बडोद्याला येण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार धर्मानंदांनी बडोद्याला जाऊन त्यांची भेट घेतली.

महाराजा सयाजीराव गायकवाड

बडोदा भेटीत महाराजांनी धर्मानंदांना विचारले, "कलकत्ता सोडून इकडे काही काम करण्याची तुमची इच्छा आहे काय?" धर्मानंद उत्तरले, "पैसा मिळवून श्रीमंत होण्याची मला मुळीच इच्छा राहिली नाही. माझ्या आवडीचे काम मला मिळाले आणि निर्वाहापुरता पैसा मिळाला तर ते मला हवे आहे." महाराज म्हणाले, "तुम्ही येथे येऊन राहत असाल तर तुम्हाला मी सर्व प्रकारे मदत करण्यास तयार आहे." धर्मानंद म्हणाले, "मी बडोद्यालाच राहावे, अशी अट महाराजांनी घालू नये. मी कोठे असलो तरी बौद्ध धर्माचे ज्ञान आमच्या महाराष्ट्र बांधवांना करून देणे, या माझ्या कर्तव्यास मुकणार नाही. तेव्हा पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी राहून माझे काम मला करू द्यावे व निर्वाहापुरती बडोदे सरकारकडून मला मदत व्हावी." त्यावेळी निश्चित असे कोणतेही आश्वासन न देता महाराज पुण्याला निघून गेले. धर्मानंदही कलकत्त्याला आले. पंधरा वीस दिवसांनी महाराजांच्या प्रायव्हेट सेक्रेटरींची पुण्याहून तार आली, "तूम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही शहरी राहत असाल तर तुम्हाला बडोदे सरकारातून दरमहा ५० रुपये मिळतील व ही मुदत ३ वर्षेपर्यंत चालू राहील. मात्र, वर्षातून एखादे पुस्तक बडोदे सरकारसाठी तुम्ही लिहून तयार केले पाहिजे." महाराजांनी देऊ केलेले वेतन धर्मानंदांनी स्वीकारले व तारेनेच त्यांचे आभार मानले. मात्र पत्राने ऑक्टोबर महिन्यात पुण्याला जाईन असे कळवले. एक महिना कलकत्त्यात राहण्यास हरकत नाही असे त्यांच्या सेक्रेटरींकडून उत्तर आले.

Thursday, October 05, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ③

दरम्यानच्या काळात धर्मानंदांनी कलकत्ता सोडून सिक्किमला भेट देण्याचे ठरवले. दक्षिणेप्रमाणे उत्तरेकडील बौद्धधर्माची माहिती मिळवण्याचा उद्देश या भेटीमागे होता. परंतु, सिक्कीममध्ये बौद्धधर्माविषयी कोणतीही माहिती त्यांच्या हाती लागली नाही. बौद्ध धर्माची लयाला गेलेलीच परिस्थिती त्यांना पाहावयास मिळाली. त्यामुळे ते कलकत्त्याला परतले.

प्रा. धर्मानंद कोसंबी

कलकत्त्यात रासबिहारी घोष, गुरुदास बॅनर्जी वगैरे मंडळींनी नॅशनल कॉलेज सुरू करण्याची योजना आखली होती. या कॉलेजच्या विषयपत्रिकेत पाली भाषेचा समावेश व्हावा असे धर्मानंदांना वाटत होते. यासाठी मनमोहन घोष यांच्या मदतीने त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. मनमोहन घोष यांनी धर्मानंदांची सत्येंद्रनाथ टागोर यांच्याशी भेट करवून दिली. धर्मानंदांच्या प्रयत्नांना यश आले. अगदी अखेरच्या क्षणी पाली भाषेचा कॉलेजच्या विषयपत्रिकेत समावेश करण्यात आला. धर्मानंदांना द्यावयाचा पगार मात्र फक्त ३० रुपये ठरविण्यात आला. पगाराची चिंता न करता काम करण्याची संधी मिळाली यामुळेच धर्मानंद जास्त खुश झाले. १५ ऑगस्ट १९०६ पासून म्हणजेच कॉलेज सुरू झाल्यापासून धर्मानंदांनी पाली भाषेचे अध्यापक म्हणून काम करण्यास सुरूवात केली.

अशा तर्‍हेने पाली भाषा शिकवणारे भारतातील पहिले केंद्र सुरू करण्यात धर्मानंदांना यश मिळाले. धर्मानंद आता प्रा. धर्मानंद कोसंबी झाले.

Wednesday, September 20, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ②

पुणे हे महाराष्ट्राचे केंद्रस्थान असल्याने तेथे काहीतरी सोय होईल असा विचार करून धर्मानंद पुण्यास पोहोचले. दिवसा काम करून उदरनिर्वाह करावा व शास्त्र्यांजवळ संस्कृत शिकावे असा त्यांचा मानस होता. पुण्यात त्यांची भेट डॉ. रा. गो. भांडारकर यांच्याशी झाली. धर्मानंदांनी त्यांना आपली सर्व हकिगत सांगितली. काही दिवस त्यांची तात्पुरती सोय झाली. परंतु, प्रार्थना समाजाचे सभासद होत असाल तरच आम्ही तुम्हाला मदत करू असे डॉ. भांडारकरांनी त्यांना सांगितले. त्यावर बौद्ध धर्माचे ज्ञान संपादन केल्याशिवाय आपणास कोणत्याही संस्थेचा सभासद होण्याची इच्छा नाही असे धर्मानंदांनी स्पष्ट केले. चर्चेत बौद्ध धर्माचे ज्ञान मिळवण्यासाठी नेपाळ किंवा सिलोनला जावे लागेल असे डॉ. भांडारकरांनी सांगितल्यामुळे धर्मानंदांनी पुणे सोडून उत्तरेस जाण्याचे ठरवले. 

धर्मानंद कोसंबी

पुण्याहून निघताना धर्मानंदांनी दोन निश्चय केले. एक, शरीरात प्राण असेपर्यंत बौद्ध धर्माचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा. दोन, जर बौद्ध धर्माचे ज्ञान संपादन करण्यात यश मिळाले तर त्याचा महाराष्ट्रवासीयांना फायदा करून द्यायचा. धर्मानंद पुण्याहून निघून ग्वाल्हेरमार्गे काशीला पोहोचले. काशीमध्ये त्यांची संस्कृत अध्ययन करण्याची सोय लागली. राहण्याची व्यवस्था मठात झाली तर जेवणासाठी त्यांना अन्नछत्राचा आधार घ्यावा लागला. प्रचंड हालअपेष्टा सोसत सव्वा वर्ष त्यांनी तिथे संस्कृतचे अध्ययन केले.

Tuesday, September 05, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ①

धर्मानंद कोसंबी यांचा जन्म गोव्यातील सासष्ट प्रांतातील 'सांखवाळ' या गावी ९ ऑक्टोबर १८७६ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव 'आनंदीबाई' व वडिलांचे नाव 'दामोदर' असे होते. पाच मुली व दोन मुले अशा एकूण सात भावंडांपैकी धर्मानंद सर्वात धाकटे होते.

धर्मानंद कोसंबी

प्रकृतीने काहीसे अशक्त परंतु बुद्धीने मात्र अतिशय तल्लख असलेल्या धर्मानंदांचे शिक्षण जेमतेम मराठी पाचवीपर्यंत झालेले होते. पुढे त्यांनी पोर्तुगीज शाळेत जाण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यांना पोर्तुगीज भाषा आवडत नव्हती. संस्कृत भाषा शिकण्याची त्यांची खूप इच्छा होती. परंतु, ती भाषा शिकण्याची सोय उपलब्ध झाली नाही. त्यामुळे धर्मानंद शाळा सोडून आपल्या वडिलांना घरच्या कारभारात मदत करू लागले. वयाच्या पंधराव्या वर्षी धर्मानंदांचा विवाह प्रतिष्ठित लाड घराण्यातील 'बाळाबाई' यांच्याशी झाला. याच सुमारास त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली. निबंधमाला, आगरकरांचे निबंध, वर्तमानपत्रे, मासिके, कादंबर्‍या असं जे मिळेल ते वाचू लागले. वाचन वाढू लागले तसतसा त्यांच्यामधला असंतोष वाढू लागला. विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या देशाची सेवा केली तशी सेवा तसं कार्य आपल्या हातून होऊ शकेल काय? आपण काय म्हणून हे जीवन जगत आहोत? अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More