Thursday, July 22, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ⑩

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची वाई येथे ब्राम्हधर्मप्रसार करण्याची इच्छा होती. ४ जुलै १९३३ रोजी वाई येथे प्रार्थनासंघाची स्थापना करण्यात आली. तिच्या अध्यक्षपदी नारायणराव चव्हाण व सेक्रेटरीपदी रामराव बाबर यांची निवड करण्यात आली. दर रविवारी चित्तशुद्धीसाठी सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना करायचे ठरले. अशा मंडळास प्रार्थनासंघ असे नाव देण्यात आले होते. पुढे याच वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात राजा राममोहन रॉय सांवत्स‍रिक पुण्यतिथीच्या निमित्ताने विठ्ठल रामजी शिंदे यांनी एक दौरा काढला होता. त्याची सुरुवात त्यांनी वाई येथून करण्याचे ठरवले होते. वाई प्रार्थनासमाजाचे काम पाहावे त्याचबरोबर सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे या उद्देशाने १४ नोव्हेंबर रोजी विठ्ठलराव यांनी भगिनी जनाक्का शिंदे, बी. बी. केसकर, गणपतराव शिंदे यांच्यासमवेत रामराव बाबर यांच्या घरी भेट दिली.

भगिनी जनाक्का शिंदे

दोन वर्षांनी १९३५ च्या मे महिन्यात विठ्ठल रामजी शिंदे हे भगिनी जनाक्का, यज्ञेश्वरपंत भांडारकर यांच्यासमवेत वाईस आले. बुद्धपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी गणपती घाट येथे बुद्धाच्या जीवनावर एक व्याख्यान दिले. या दौऱ्यात प्रार्थनासंघासाठी वाईत जागेची सोय झाली. वाई येथे प्रार्थनासमाजाच्या स्थापनेमुळे विठ्ठलराव खूप समाधानी झाले. वाई व आजूबाजूच्या गावांमध्ये जाताना विठ्ठलरावांच्या बरोबर भगिनी जनाक्का, बाबर कुटुंबीय, नारायणराव चव्हाण कुटुंबीय असत.

Thursday, July 15, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ⑨

विठ्ठल रामजी शिंदे यांचे डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम जोमाने सुरू होते. त्यासाठी त्यांना वेळही द्यावा लागत होता. या व इतर काही कारणांमुळे प्रार्थनासमाजातील काही मोठी मंडळी त्यांच्यावर नाराज होती. त्यामुळे नोव्हेंबर १९१० रोजी मुंबईत प्रार्थनासमाजाने एक ठराव करून विठ्ठल रामजी शिंदे यांना प्रचारक म्हणून चक्क काढून टाकले.

सलग ७ वर्षे विठ्ठलरावांनी अगदी निष्ठेने प्रचारकाचे काम केल्यानंतर त्यांचे प्रार्थनासमाजाशी असलेले नाते आता संपले होते. असे असले तरी त्यांनी धर्मप्रसार हे जीवनकार्य म्हणून स्वीकारले होते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या असतानाही मोठ्या हिमतीने त्यांनी अजून दोन वर्षे मुंबईत काढली. त्यानंतर आर्थिक अडचणी, मुंबईत जागेचा प्रश्न व अशा अनेक कारणांमुळे त्यांनी आपल्या मिशनचे कार्यालय पुण्यास हलवले.

भगिनी जनाक्का शिंदे

भगिनी जनाक्कांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने ज्या निराश्रित सेवासदनाची जबाबदारी पार पाडली ते सदन आर्थिक मदत बंद झाल्याने बंद करावे लागले होते. त्यामुळे त्यांना वऱ्हाड आणि मध्यप्रांताची परिस्थिती पाहण्यासाठी तिकडे पाठवण्यात आले. त्या यवतमाळ येथे एक छोटे वसतिगृह सुरू करून चालवू लागल्या.

Friday, July 09, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ⑧

विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी मुंबई येथे ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ अर्थात ‘भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी’ ही संस्था अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासाठी व अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी स्थापन केली. मिशनच्या अध्यक्षपदी सर नारायण चंदावरकर, उपाध्यक्षपदी शेठ दामोदरदास सुखडवाला, खजीनदार नारायणराव पंडित तर मिशनच्या जनरल सेक्रेटरीपदी स्वतः विठ्ठल रामजी शिंदे राहिले. मिशनच्या कामासाठी विठ्ठलरावांनी आपल्या बहिणीला जनाक्कांना पनवेलवरून मुंबईस बोलवून घेतले. मिशनच्या कामात सहभागी होण्यासाठी त्यांनी पनवेलच्या शाळेतील मुख्याध्यापिका या पदाचा राजीनामा दिला होता. प्रार्थनासमाजाची कामे जसे की भजन करणे, गोरगरिबांची विचारपूस करणे अशी कामे त्या पूर्वीही करत असत. विठ्ठलरावांनी जनाक्कांना मिशनची कार्यवाह म्हणून नेमले. त्यांचे आई-वडीलही मिशनच्या कामात सहभागी झाले.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

मिशनचे काम जोमाने सुरू झाले होते. दर शनिवारी व्याख्याने व कीर्तने होत. रविवारी सकाळी धर्मशिक्षणाचे वर्ग व सायंकाळी उपासना चाले. विठ्ठलराव स्वतः व भगिनी जनाक्का ही कामे करत. पाहता पाहता सर्वत्र मिशनचीच चर्चा होऊ लागली. वर्तमानपत्रांनीही दखल घेऊन ते मिशनच्या कार्याबद्दल छापू लागले.

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More