श्रीधरपंतांनी लिहिलेल्या तिसऱ्या म्हणजे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात 'माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता.' हे वाक्य आले आहे. या वाक्यातून श्रीधरपंतांच्या मृत्यूचे कारण समजण्यास मदत होते. श्रीधरपंतांना वडिलांचा केसरी आपल्या हातात मिळवण्याची खूप इच्छा होती. परंतु त्यांचा केसरीच्या ट्रस्टींबरोबर 'केसरी' वृत्तपत्राच्या मालकीवरून व इतर मालकी हक्कांसाठी कायदेशीर लढा सुरू होता. सतत कोर्टाच्या फेऱ्या त्यांना माराव्या लागत होत्या. त्याचा त्यांना मनस्ताप होत होता.
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपत्राचा दाखला देत जावई विश्वनाथ केतकर वकिलांनी माहिती दिली होती की मृत्यूपत्रानुसार टिळकपुत्रांना केसरी आणि मराठाच्या ट्रस्टवर राहता येणार नाही. टिळकपुत्रांनी त्यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवला खरा पण पुढे पुरोगामी वर्तुळात वावरणाऱ्या टिळकपुत्रांच्या लवकरच लक्षात आले की, 'केसरी' आणि 'मराठा' ट्रस्टबाबत आपणास फसवण्यात आले आहे. केसरी-मराठाच्या ट्रस्टवर आपल्या मुलांना घेऊ नये, असं स्पष्टपणे लोकमान्य टिळकांनी लिहिले नव्हते तर 'लायक वाटल्यास' घ्यावे असे लिहिले होते.
श्रीधरपंतांनी आत्महत्येपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लिहिलेले पत्र |
रामभाऊ आणि श्रीधरपंत हे दोघे बंधु पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचे होते. श्रीधरपंताना महाविद्यालयीन जीवनापासूनच लिखाणाची आवड होती. स्वतः लोकमान्य त्यांच्याकडून कवितांचे अनुवाद करून घेत असत. त्यांनी श्रीधरपंताना लिखाणासाठी कायम उत्तेजनच दिले. ‘A Midsummer Nights Dream!’ किंवा ‘ऐन उन्हाळ्यातील एक स्वप्नदृश्य!’ आणि ‘मराठी शाकुंतलाचे परीक्षण’ हे लेख वाङमयसमीक्षेचा नमूना म्हणता येतात. ‘बादरायण संबंध’, ‘कलमबहादुराचे शेलापागोटे!’ असे त्यांचे लेख प्रसिद्ध होते. प्रागतिक विचारांच्या श्रीधरपंतांचे कुठल्याही प्रकारचे लेखन कधीही केसरीत प्रकाशित झाले नाही. केसरीच्या विचारसरणीला प्रागतिक विचार झेपणार कसे? श्रीधरपंत काकासाहेब लिमये यांच्या ज्ञानप्रकाश आणि विविधवृत्त या नियतकालिकांमधून लिखाण करत. आपल्या लेखणीतून ते जातीयता, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, ब्राम्हण्यवाद यावर सडकून टीका करत. आपण गोपाळ गणेश आगरकरवादी आहोत असं श्रीधरपंत छातीठोकपणे सांगत. एकदा का केसरी ताब्यात आला की महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवून देईन असंही म्हणत. श्रीधरपंतांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते.