Wednesday, September 20, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ②

पुणे हे महाराष्ट्राचे केंद्रस्थान असल्याने तेथे काहीतरी सोय होईल असा विचार करून धर्मानंद पुण्यास पोहोचले. दिवसा काम करून उदरनिर्वाह करावा व शास्त्र्यांजवळ संस्कृत शिकावे असा त्यांचा मानस होता. पुण्यात त्यांची भेट डॉ. रा. गो. भांडारकर यांच्याशी झाली. धर्मानंदांनी त्यांना आपली सर्व हकिगत सांगितली. काही दिवस त्यांची तात्पुरती सोय झाली. परंतु, प्रार्थना समाजाचे सभासद होत असाल तरच आम्ही तुम्हाला मदत करू असे डॉ. भांडारकरांनी त्यांना सांगितले. त्यावर बौद्ध धर्माचे ज्ञान संपादन केल्याशिवाय आपणास कोणत्याही संस्थेचा सभासद होण्याची इच्छा नाही असे धर्मानंदांनी स्पष्ट केले. चर्चेत बौद्ध धर्माचे ज्ञान मिळवण्यासाठी नेपाळ किंवा सिलोनला जावे लागेल असे डॉ. भांडारकरांनी सांगितल्यामुळे धर्मानंदांनी पुणे सोडून उत्तरेस जाण्याचे ठरवले. 

धर्मानंद कोसंबी

पुण्याहून निघताना धर्मानंदांनी दोन निश्चय केले. एक, शरीरात प्राण असेपर्यंत बौद्ध धर्माचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा. दोन, जर बौद्ध धर्माचे ज्ञान संपादन करण्यात यश मिळाले तर त्याचा महाराष्ट्रवासीयांना फायदा करून द्यायचा. धर्मानंद पुण्याहून निघून ग्वाल्हेरमार्गे काशीला पोहोचले. काशीमध्ये त्यांची संस्कृत अध्ययन करण्याची सोय लागली. राहण्याची व्यवस्था मठात झाली तर जेवणासाठी त्यांना अन्नछत्राचा आधार घ्यावा लागला. प्रचंड हालअपेष्टा सोसत सव्वा वर्ष त्यांनी तिथे संस्कृतचे अध्ययन केले.

Tuesday, September 05, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ①

धर्मानंद कोसंबी यांचा जन्म गोव्यातील सासष्ट प्रांतातील 'सांखवाळ' या गावी ९ ऑक्टोबर १८७६ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव 'आनंदीबाई' व वडिलांचे नाव 'दामोदर' असे होते. पाच मुली व दोन मुले अशा एकूण सात भावंडांपैकी धर्मानंद सर्वात धाकटे होते.

धर्मानंद कोसंबी

प्रकृतीने काहीसे अशक्त परंतु बुद्धीने मात्र अतिशय तल्लख असलेल्या धर्मानंदांचे शिक्षण जेमतेम मराठी पाचवीपर्यंत झालेले होते. पुढे त्यांनी पोर्तुगीज शाळेत जाण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यांना पोर्तुगीज भाषा आवडत नव्हती. संस्कृत भाषा शिकण्याची त्यांची खूप इच्छा होती. परंतु, ती भाषा शिकण्याची सोय उपलब्ध झाली नाही. त्यामुळे धर्मानंद शाळा सोडून आपल्या वडिलांना घरच्या कारभारात मदत करू लागले. वयाच्या पंधराव्या वर्षी धर्मानंदांचा विवाह प्रतिष्ठित लाड घराण्यातील 'बाळाबाई' यांच्याशी झाला. याच सुमारास त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली. निबंधमाला, आगरकरांचे निबंध, वर्तमानपत्रे, मासिके, कादंबर्‍या असं जे मिळेल ते वाचू लागले. वाचन वाढू लागले तसतसा त्यांच्यामधला असंतोष वाढू लागला. विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या देशाची सेवा केली तशी सेवा तसं कार्य आपल्या हातून होऊ शकेल काय? आपण काय म्हणून हे जीवन जगत आहोत? अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More