पुणे हे महाराष्ट्राचे केंद्रस्थान असल्याने तेथे काहीतरी सोय होईल असा विचार करून धर्मानंद पुण्यास पोहोचले. दिवसा काम करून उदरनिर्वाह करावा व शास्त्र्यांजवळ संस्कृत शिकावे असा त्यांचा मानस होता. पुण्यात त्यांची भेट डॉ. रा. गो. भांडारकर यांच्याशी झाली. धर्मानंदांनी त्यांना आपली सर्व हकिगत सांगितली. काही दिवस त्यांची तात्पुरती सोय झाली. परंतु, प्रार्थना समाजाचे सभासद होत असाल तरच आम्ही तुम्हाला मदत करू असे डॉ. भांडारकरांनी त्यांना सांगितले. त्यावर बौद्ध धर्माचे ज्ञान संपादन केल्याशिवाय आपणास कोणत्याही संस्थेचा सभासद होण्याची इच्छा नाही असे धर्मानंदांनी स्पष्ट केले. चर्चेत बौद्ध धर्माचे ज्ञान मिळवण्यासाठी नेपाळ किंवा सिलोनला जावे लागेल असे डॉ. भांडारकरांनी सांगितल्यामुळे धर्मानंदांनी पुणे सोडून उत्तरेस जाण्याचे ठरवले.
![]() |
धर्मानंद कोसंबी |
पुण्याहून निघताना धर्मानंदांनी दोन निश्चय केले. एक, शरीरात प्राण असेपर्यंत बौद्ध धर्माचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा. दोन, जर बौद्ध धर्माचे ज्ञान संपादन करण्यात यश मिळाले तर त्याचा महाराष्ट्रवासीयांना फायदा करून द्यायचा. धर्मानंद पुण्याहून निघून ग्वाल्हेरमार्गे काशीला पोहोचले. काशीमध्ये त्यांची संस्कृत अध्ययन करण्याची सोय लागली. राहण्याची व्यवस्था मठात झाली तर जेवणासाठी त्यांना अन्नछत्राचा आधार घ्यावा लागला. प्रचंड हालअपेष्टा सोसत सव्वा वर्ष त्यांनी तिथे संस्कृतचे अध्ययन केले.