Friday, June 22, 2018

दामोदर धर्मानंद कोसंबी ⑫ काही महत्वाचे ग्रंथ प्रकाशित

दामोदर कोसंबींनी पंडित कृष्णमूर्ती शर्मा यांच्याबरोबर 'शतकत्रयी' व राम आचार्य यांच्याबरोबर 'सुभाषित त्रिशती' ही भर्तृहरीवर लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध केली. आचार्य मुनी जिनविजयजी यांनी, 'पूर्ण वेळ संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम करणार्‍या विद्वानांनी या तरुण गणितज्ञापासून स्फूर्ती घ्यावी' अशा शब्दात कोसंबींचे कौतुक केले.


हार्वर्ड विद्यापीठातील संस्कृतचे प्रा. डॅनिएल इंगाल्स यांनी कोसंबींच्या शतकत्रयी ग्रंथाने प्रभावित होऊन 'सुभाषितरत्नकोश' या ग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीचे काम त्यांच्यावर सोपवले. संस्कृत भाषेतील लिखित स्वरुपातील सर्वात प्राचीन असा हा ग्रंथ आहे. यात सहसंपादक म्हणून फर्ग्युसन कॉलेजमधील कोसंबींचे मित्र प्रा. गोखले यांनीही काम केले. हा ग्रंथ अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठातर्फे प्रकाशित झाला.

Thursday, June 14, 2018

दामोदर धर्मानंद कोसंबी ⑪ वैचारिक मतभेद

१९४७ साली अणुशक्ती आयोगाची स्थापना झाली होती. त्याचे अध्यक्षपद डॉ. होमी भाभांकडेच होते. त्यामुळे भाभांवर खूप महत्वाच्या जबाबदार्‍या आल्या होत्या. १९४९ पासून (कोसंबी परदेशात असताना) भाभांनी अनेक उत्तमोत्तम संशोधकांची संस्थेत भरती केली. यात अमेरिकेतील प्रिन्स्टन येथे हर्मान वाईल या नावाजलेल्या गणितज्ञाचे शिष्य डॉ. कोमारवलू चंद्रशेखरन यांचा समावेश होता. अतिशय बुद्धिवान अशा डॉ. कोमारवलू चंद्रशेखरन यांची संस्थेत गणित विभागात प्रमुख म्हणून भाभांनी नेमणूक केली. मनुष्यबळ वाढल्याने पेडर रोडवरील केनिलवर्थ बंगल्यातील जागा संस्थेसाठी अपुरी पडू लागली होती. त्यामुळे भाभांनी संस्थेसाठी गेट वे ऑफ इंडिया शेजारच्या ओल्ड यॉट क्लबची मोठी इमारत घेतली व संस्था तेथे हलवली. कोसंबी आपला विदेश दौरा पूर्ण करून आले तेव्हा संस्थेच्या नव्या इमारतीत रुजू झाले. त्यांच्या अनुपस्थितीत झालेले बदल त्यांना दिसून आले. साहजिकच त्यांचा अहंकार दुखावला गेला. या घटनेमुळे भाभा व कोसंबी यांच्यात ताण निर्माण होण्यास सुरुवात झाली.

डी.डी. कोसंबी व डॉ. होमी भाभा यांच्यात वैचारिक मतभेद

एकीकडे भाभा अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष असल्याने त्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. तर दुसरीकडे कोसंबी जागतिक शांतता परिषदेत सहभागी होऊन अणुकार्यक्रमाच्या विरोधात उभे राहिले होते. भारतात ऊर्जानिर्मिती करण्यासाठी ते सौरऊर्जेचा पुरस्कार करू लागले. यामुळे परिस्थिती जास्तच चिघळत गेली. भाभा व कोसंबी एकमेकांशी बोलणे तर सोडाच साधी नजरानजर देखील करेनासे झाले. दोघेही आपापल्या तत्वांशी एकनिष्ठ असल्यामुळे कुणीही माघार घ्यायला तयार नव्हते.

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More