Friday, November 15, 2019

एक अलक्षित अप्पा ②

१२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून महात्मा गांधीजींची दांडी यात्रा निघाली. ही यात्रा ५ एप्रिल रोजी दांडी येथे पोहोचली. मिठाचा कायदा मोडण्यासाठी ही यात्रा होती. ६ अप्रिलच्या पहाटे नेहमीची प्रार्थनासभा आटोपल्यानंतर गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी पायी चालत समुद्रकिनाऱ्याकडे जाऊन तयार झालेले मूठभर मीठ उचलून मिठाचा कायदाभंग केला. त्यावेळी इकडे महाराष्ट्रात अप्पांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी व शिरोडे येथे मिठाचा सत्याग्रह झाला. अप्पांनी रत्नागिरी येथे किल्ल्याच्या खडकात नैसर्गिकरित्या तयार झालेले मीठ उचलून सत्याग्रह केला. अप्पासाहेबांना त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह तुरुंगात टाकण्यात आले. रत्नागिरी येथील तुरुंगात त्यांना सहा महीने ठेवण्यात आले.

कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन

रत्नागिरी येथे तुरुंगात अप्पांना समजले की कातकरी समाजाच्या कैद्यांना तुरुंगात भंगीकाम करावे लागते. अप्पांना हे पटले नाही. तुरुंगात भंगीकाम मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहून उपोषण सुरू केले. ही बातमी गांधीजींना कळताच त्यांनी अप्पांना एक मोठी तारच केली, “तुझ्या अल्पाशनाची बातमी माझ्या कानावर आली. तुला साथ देणे माझे कर्तव्य असल्याने मीही सरकारला नोटिस देऊन अनशन सुरू केले आहे.” त्यानंतरही अप्पांना हिंडलग्याच्या तुरुंगात तीन महिने सक्तमजुरी, येरवडा जेल येथे सहा महीने व पुनः रत्नागिरीच्या तुरुंगात २ वर्षाची शिक्षा झाली. यावेळी मात्र अप्पांना भंगीकाम देण्यात आले. प्रत्येक दिवशी अप्पांचे १२ वेगवेगळे सवर्ण सहकारी हे काम करत. अप्पा स्वतः दर रविवारी संडास सफाई करत.

१९३३ साली तुरुंगातून सुटल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसच्या तालुका कामिट्यांचे गठन केले. जिल्हा कमिटीही नेमली. पुढे १९३७ मध्ये काँग्रेस मंत्रिमंडळे तयार झाली तेव्हा काँग्रेसमध्ये भाऊगर्दी सुरू झाली. त्यामुळे अप्पांनी इथून आपण सत्याग्रहात भाग न घेता फक्त रचनात्मक कामातच भाग घेऊ असे गांधीजींना कळवले. याच काळात गांधीजींनी संपूर्ण भारतातील आपल्या निवडक सात अनुयायांचा गांधी सेवा संघ सुरू केला व अप्पांना त्याचे अध्यक्ष केले.

३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींना तीन गोळ्या मारून त्यांची हत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी अप्पांच्या कानावर धडकली. चार वर्षांपूर्वी हिंडलग्याच्या तुरुंगातून सुटल्यावर अप्पा पाचगणीला गांधीजींना भेटायला गेले होते. ती अप्पांची गांधीजींशी झालेली शेवटची भेट होती. त्या भेटीत महादेवभाईंचा मृत्यू झाल्याने अप्पांना सेक्रेटरी म्हणून ठेवून घेण्याची गांधीजींची इच्छा असल्याचे अप्पांना जाणवले होते. गांधीजींच्या त्या इच्छेची आपल्याकडून अवज्ञा घडल्याची खंत पुढे अप्पांच्या मनात कायम राहिली.

१५ मार्च १९४८ रोजी देशभरच्या गांधीभक्तांचे संमेलन भरवण्यात आले. डॉ. राजेंद्र प्रसाद या संमेलनाचे अध्यक्ष होते. पंडित नेहरूही आले होते. हे संमेलन गांधी सेवा संघातर्फे भरवण्यात आले होते. या संमेलनात सर्वोदय समाजाची स्थापना करण्यात आली. सामाजिक समता + आर्थिक समता = सर्वोदय हे अप्पांचे सूत्र होते. अप्पांनी सर्वोदयच्या दृष्टीने पूर्वीच काम सुरू केले होते. जमीन ब्राम्हणांची कष्ट मात्र कुणब्यांचे ही गोष्ट अप्पांना लहानपणापासून खटकत होती. त्यामुळे प्रांतिक सरकार येताच त्यांनी ‘खोती विसर्जनाचा’ कायदा करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला.

५ मे १९४८ रोजी अप्पांनी कणकवलीजवळील वाकदे गावात गोपुरी आश्रम स्थापन केला. दलितोद्धार, शेती-गोपालन व ग्रामोद्योग यांची उत्पादनक्षमता वाढवणे, पडीक जमिनीचा वापर करणे, स्वावलंबन, खादी ग्रामोद्योगाचा प्रसार, गोशाळा चालवणे ही काही गोपुरी आश्रमाची उद्दिष्टे होती. दूरदूरचे लोक गोपुरी आश्रम पाहायला येत.

१९५२ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कोकण दौरा झाला. पंडितजींना जेव्हा समजले की अप्पा तिथे आहेत तेव्हा त्यांनी १५ मिनिटे अप्पांसाठी गोपुरीत राखून ठेवली.  ठरल्याप्रमाणे पंडितजींनी गोपुरीत अप्पांची भेट घेतली. कणकवलीत झालेल्या जाहीर सभेत पंडित नेहरू यांनी अप्पांचा 'कोकण गांधी' असा उल्लेख केला. 

आपल्या अखेरच्या दिवसात अप्पांनी भूदान आंदोलन व चलनशुद्धीसाठी महाराष्ट्रभर पदयात्रा काढल्या. भूदान यशस्वी होण्यासाठी व्याजप्रथा बंद व्हायला हवी त्याचबरोबर काहींना जमिनीऐवजी अन्य उद्योग मिळायला हवा असे अप्पांचे म्हणणे होते. व्याजप्रथा बंद होण्यासाठी चलनशुद्धी हा उपाय त्यांनी काढला होता. सरकारने दरवर्षाअखेर नोटा रद्द ठरवल्या पाहिजेत आणि शेकडा सहा टक्के फी घेऊन नव्या नोटा दिल्या तर व्याजप्रथा कमकुवत होईल अशी त्यांची योजना होती. विनोबांनीही चलनशुद्धीसाठी पाठिंबा दिल्याने अप्पा आनंदी झाले होते.

३० जानेवारी १९७० रोजी अप्पा गोपुरीत परतले. त्यांचे शरीर थकले होते. ते आजारी पडले. दूध तर सोडलेच परंतु अॅलोपॅथी औषधेही घेण्याचे नाकारू लागले. त्यांना पुण्याजवळील ऊरुळी कांचन निसर्गोपचार केंद्रात नेण्यात आले परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अखेर १० मार्च १९७१ रोजी वयाच्या ७७व्या वर्षी अप्पांचे निधन झाले.

संदर्भ:

  • कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन (चरित्र) - प्रा. सतीशचंद्र तोडणकर
  • श्रीधर बळवंत टिळक (चरित्र आणि लेखसंग्रह) - अनंत देशमुख

एक अलक्षित अप्पा ①

सीताराम पटवर्धन उर्फ अप्पा यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी रत्नागिरीजवळील आगरगुळे या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पुरुषोत्तम व आईचे नाव राधा होते. सात मुले व चार मुली अशा एकूण ११ भावंडांपैकी अप्पासाहेब पाचवे होते.

अप्पांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. १९११ साली अप्पा मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा पाचवा नंबर येऊन उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९१६ साली अप्पा बी.ए. प्रथम वर्गात पास झाले. १९१७ साली अप्पा एम.ए. चा अभ्यास करू लागले. या काळात अप्पांना पुण्यातील न्यू कॉलेजमध्ये [आताचे एस.पी. कॉलेज] प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली.

कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन

अप्पा एस.पी. कॉलेजच्या वसतिगृहात अनेकदा वाढपी म्हणून काम करायचे. एकदा तर अप्पा पुण्यातील भर रस्त्यावरून आपले सामान डोक्यावर घेऊन वसतिगृहाकडे निघाले. त्यावेळी त्यांच्यासोबत असणारा त्यांचा भाऊ म्हणाला, “डोक्यावर का?” त्यावर अप्पा उत्तरले, “जोपर्यंत पांढरपेशे असे करणार नाहीत तोपर्यंत हमाल मजुरांनीच डोक्यावर ओझे घ्यायचे असते असा समज राहील.”

अप्पांच्या वाचनात अगदी तरुण वयात जॉन रस्कीनचे ‘अंटू धीस लास्ट’ हे पुस्तक आले. ह्या पुस्तकाचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम झाला. त्यांना कृत्रिम किंवा चैनीचे आयुष्य जगणे खोटेपणाचे वाटू लागले. अगदी साधं आयुष्य जगण्याची ओढ त्यांच्यात निर्माण झाली.

अगदी कळायला लागल्यापासून अप्पांचा कल ब्रम्हचर्याकडे कल होता. त्यांनी आजन्म ब्रम्हचर्याचे पालन केले.

१९१९ साली मार्च महिन्यात महात्मा गांधीजींनी पुकारलेल्या रौलट अ‍ॅक्ट सत्याग्रहात अप्पांनी सामील व्हायचे ठरवले. अप्पांनी आपल्या प्राध्यापकीचा राजीनामा देऊन सत्याग्रहात आपले नाव नोंदवले. नाव नोंदवून घेण्यासाठी महादेवभाई देसाई यांच्यासह गांधीजी स्वतः हजर होते. पुढे मे महिन्यात अप्पासाहेब गांधीजींना भेटायला मुंबईत मणीभवन येथे गेले. गांधीजींनी अप्पासाहेबांकडे पाहिले आणि स्वतःच बोलण्यास सुरुवात केली, “मी अलीकडेच यंग इंडिया हे अर्धसाप्ताहिक चालवायला घेतले आहे. महादेव म्हणतात तुमचा या कामात चांगलाच उपयोग होऊ शकेल. आहे का खुशी या कामात सहभागी भाग घेण्याची?” आप्पांनी त्वरित होकार दिला. घरखर्च व स्वतःचा मासिक खर्च यासाठी आप्पांची ५० रुपयांची मागणी गांधीजींनी मान्य केली. अशा प्रकारे प्राध्यापक म्हणून २०० रुपयांची नोकरी सोडून अप्पा गांधीजींसोबत आले.

गांधीजींनी ह्याच वर्षी म्हणजे १९१९ साली आप्पासाहेबांना मिठाच्या कायद्याचा अभ्यास करायला सांगितले. अप्पांनी अत्यंत कष्टपूर्वक बारकाईने या कायद्याचा अभ्यास केला. वेळोवेळी गांधीजी आणि अप्पा यांच्यात बैठका होत. गांधीजींनी प्रत्यक्ष १९३० साली मिठाचा सत्याग्रह केला पण त्याची पूर्वतयारी किती आधीपासून केली होती ही गोष्ट नोंद घेण्याजोगी आहे.

अप्पांनी साबरमतीच्या राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणूनही काम केले. तिथे त्यांची आचार्य विनोबा भावे यांच्याशी ओळख झाली. दोघांमध्ये तत्वज्ञान विषयांवर चर्चा झाली. तिथे विनोबा संस्कृत व अप्पा इंग्रजी विषय शिवकत. पुढे गुजरात विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा अप्पा तिथे तत्वज्ञान शिकवू लागले.

अप्पांनी गांधीजींना अगदी सुरुवातीलाच सांगितले होते, “चरखा प्रसार हाच माझ्या कार्याचा मध्यबिंदू राहील. मी गावी घरी राहू इच्छितो. वृद्ध आईची सेवा घडेल व कामही होईल.” त्याप्रमाणे १९२१ साली अप्पा आपल्या जन्मभूमीकडे म्हणजे रत्नागिरीकडे परतले. गांधीजींनी त्यास हरकत घेतली नाही. अप्पांनी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय शाळेत अध्यापन केले. खादी ग्रामोद्योगाचा प्रसार केला. विणकरांच्या परिस्थितीची पाहणी केली. अस्पृश्यता निवारण, कुणबी शिक्षण, कुळ कायदा त्याचबरोबर हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही काम केले.

पुरोगामी विचारांच्या लोकमान्य टिळकांच्या मुलांनी रामभाऊ आणि श्रीधरपंत यांनी ८ एप्रिल १९२८ साली आज ज्याला केसरीवाडा म्हणून ओळखले जाते त्या गायकवाड वाड्यामध्ये समता संघाची स्थापना केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कार्यक्रमात गायकवाड वाड्याच्या ग्रंथालयामध्ये अस्पृश्यांसह सहभोजन ठेवण्यात आले होते. तिथे बोलताना अप्पासाहेब म्हणाले, "केवळ सहभोजन पुरेसे नाही. त्याहून अधिक महत्वाचे आहे उपयुक्त व आवश्यक पण घृणित मानल्या गलेल्या धंद्याबाबतची घृणा मोडून काढणे. त्याकरिता आपण न्हावी कामही केले पाहिजे." कार्यक्रम संपल्यावर सगळे जेवण करून पसार झाले. उष्टी काढण्यासाठी एका भंग्यालाच बोलावले होते. त्याने व आप्पांनी उष्टी काढली. त्यावर अप्पा म्हणाले, "माझा कार्यक्रम माझ्या एकमताने पास होऊन तात्काळ आमलातही आला."

१९३० साली अप्पांनी एक अत्यंत महत्वाचे काम केले. त्यांनी महात्मा गांधीजींच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्राचे मूळ गुजरातीतून मराठीत भाषांतर केले. अप्पासाहेबांमुळे गांधीजींचे आत्मचरित्र मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाले. विशेष म्हणजे यासाठी अप्पांनी कोणतेही मानधन घेतले नाही. नवजीवन प्रेसकडून त्यांनी पुस्तकाची फक्त एक प्रत घेतली.

संदर्भ:

  • कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन (चरित्र) - प्रा. सतीशचंद्र तोडणकर
  • श्रीधर बळवंत टिळक (चरित्र आणि लेखसंग्रह) - अनंत देशमुख

Saturday, May 25, 2019

लोकमान्य श्रीधरपंत टिळक ②

श्रीधरपंतांनी लिहिलेल्या तिसऱ्या म्हणजे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात 'माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता.' हे वाक्य आले आहे. या वाक्यातून श्रीधरपंतांच्या मृत्यूचे कारण समजण्यास मदत होते. श्रीधरपंतांना वडिलांचा केसरी आपल्या हातात मिळवण्याची खूप इच्छा होती. परंतु त्यांचा केसरीच्या ट्रस्टींबरोबर 'केसरी' वृत्तपत्राच्या मालकीवरून व इतर मालकी हक्कांसाठी कायदेशीर लढा सुरू होता. सतत कोर्टाच्या फेऱ्या त्यांना माराव्या लागत होत्या. त्याचा त्यांना मनस्ताप होत होता.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपत्राचा दाखला देत जावई विश्वनाथ केतकर वकिलांनी माहिती दिली होती की मृत्यूपत्रानुसार टिळकपुत्रांना केसरी आणि मराठाच्या ट्रस्टवर राहता येणार नाही. टिळकपुत्रांनी त्यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवला खरा पण पुढे पुरोगामी वर्तुळात वावरणाऱ्या टिळकपुत्रांच्या लवकरच लक्षात आले की, 'केसरी' आणि 'मराठा' ट्रस्टबाबत आपणास फसवण्यात आले आहे. केसरी-मराठाच्या ट्रस्टवर आपल्या मुलांना घेऊ नये, असं स्पष्टपणे लोकमान्य टिळकांनी लिहिले नव्हते तर 'लायक वाटल्यास' घ्यावे असे लिहिले होते.

श्रीधरपंतांनी आत्महत्येपूर्वी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांना लिहिलेले पत्र

रामभाऊ आणि श्रीधरपंत हे दोघे बंधु पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचे होते. श्रीधरपंताना महाविद्यालयीन जीवनापासूनच लिखाणाची आवड होती. स्वतः लोकमान्य त्यांच्याकडून कवितांचे अनुवाद करून घेत असत. त्यांनी श्रीधरपंताना लिखाणासाठी कायम उत्तेजनच दिले. ‘A Midsummer Nights Dream!’ किंवा ‘ऐन उन्हाळ्यातील एक स्वप्नदृश्य!’ आणि ‘मराठी शाकुंतलाचे परीक्षण’ हे लेख वाङमयसमीक्षेचा नमूना म्हणता येतात. ‘बादरायण संबंध’, ‘कलमबहादुराचे शेलापागोटे!’ असे त्यांचे लेख प्रसिद्ध होते. प्रागतिक विचारांच्या श्रीधरपंतांचे कुठल्याही प्रकारचे लेखन कधीही केसरीत प्रकाशित झाले नाही. केसरीच्या विचारसरणीला प्रागतिक विचार झेपणार कसे? श्रीधरपंत काकासाहेब लिमये यांच्या ज्ञानप्रकाश आणि विविधवृत्त या नियतकालिकांमधून लिखाण करत. आपल्या लेखणीतून ते जातीयता, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, ब्राम्हण्यवाद यावर सडकून टीका करत. आपण गोपाळ गणेश आगरकरवादी आहोत असं श्रीधरपंत छातीठोकपणे सांगत. एकदा का केसरी ताब्यात आला की महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवून देईन असंही म्हणत. श्रीधरपंतांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते.

लोकमान्य श्रीधरपंत टिळक ①

२५ मे १९२८ च्या सायंकाळी श्रीधरपंत टिळक नेहमीप्रमाणे फिरायला जायच्या तयारीत होते. घरातून बाहेर पडण्याआधी त्यांनी आपली पत्नी आणि मुलांना डोळेभरून पाहिले. त्याच दिवशी सकाळी लिहिलेली तीन पत्रे त्यांनी आपल्या सोबत घेतली आणि घराबाहेर पडले. श्रीधरपंतांनी तिन्ही पत्रे त्यांनी टपालपेटीत टाकली आणि थेट भांबुर्डा (आताचे शिवाजीनगर) रेल्वेस्थानकावर गेले. तिथे ते मुंबई-पुणे एक्स्प्रेसची वाट पाहू लागले. काही वेळाने रेल्वेच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला. गाडी जवळ येताच अंगातील बळ एकवटून त्यांनी रेल्वेसमोर उडी घेतली. क्षणार्धात श्रीधरपंतांनी जगाचा निरोप घेतला. सर्वत्र सन्नाटा पसरला..

लोकमान्य श्रीधरपंत टिळक

लोकमान्य टिळकांच्या धाकट्या मुलाच्या आत्महत्येची बातमी बघता बघता पुण्यात पसरली. घटनास्थळी पोलीस पोहोचले. पंचनामा झाला. पार्थिव गायकवाड वाड्यात आणले गेले. श्रीधरपंतांनी स्थापन केलेल्या समता संघाचे कार्यकर्ते तिथे मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. श्रीधरपंतांच्या पत्नी शांताबाई आणि तिन्ही लेकरं टाहो फोडत होती. थोरला मुलगा जयंत सात वर्षांचा होता. त्यापाठची दोन्ही मुलं अगदी लहान होती. चौथ्या बाळासाठी शांताबाईंना दिवसही गेले होते.

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More