Sunday, November 19, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ⑥

धर्मानंदांची पुण्यातील या वास्तव्यात महात्मा गांधीजींशी पहिल्यांदा भेट झाली. आचार्य कृपलानी एकदा पुण्याला आले होते. त्यावेळी काकासाहेब कालेलकर यांच्यामुळे धर्मानंदांची आचार्य कृपलानी यांच्याशी ओळख व पुढे मैत्री झाली होती. पुढे १९१६ साली गांधीजी पुण्याला आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर कृपलानीही होते. याच वेळी कृपलानी यांनी धर्मानंदांची गांधीजींशी भेट घडवून आणली.

महात्मा गांधी

पहिल्या अमेरिका भेटीत ‘विशुद्धीमार्ग’ या बौद्धग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे ते काम तडीस नेण्याच्या उद्देशाने हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. जेम्स वुड्स हे धर्मानंदांना पुन्हा अमेरिकेस येण्यासाठी पत्राद्वारे आग्रह करत होते. विशुद्धीमार्गाचे काम पूर्ण करण्याची ही छान संधी आहे असे समजून धर्मानंदांनी सहा वर्षांनंतर दुसर्‍या वेळेस अमेरिकेला जाण्याचे ठरवले. फर्ग्युसन कॉलेजने त्यांना कॉलेज सोडून जाऊ नये म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पगार इतर सभासदांइतका १०० रुपये करण्याचीही तयारी दर्शवली. अखेर कॉलेजने त्यांचा राजीनामा न स्वीकारता त्यांना दोन वर्षाची बिनपगारी रजा दिली.

Friday, November 03, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ⑤

पुण्यात येऊन धर्मानंदांना एक वर्ष होत आले होते. एके दिवशी डॉ. जेम्स वूड्स यांचे अमेरिकेहून धर्मानंदांना निकडीचे पत्र आले. त्यात लिहिले होते की, "हार्वर्ड विद्यापीठात माजी प्रोफेसर वारन यांनी चालवलेल्या 'विशुद्धीमार्ग' या बौद्ध ग्रंथाची चिकित्सक आवृत्ती तयार करण्याच्या कामी तुमच्या मदतीची गरज आहे. त्वरित येण्याची कृपा करावी." 

आचार्य धर्मानंद कोसंबी

धर्मानंदांनी अमेरिकेस जाण्याचे ठरवले. श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांकडून जाण्याची परवानगी घेतली. धर्मानंद इंग्लंडमार्गे अमेरिकेला जाण्यास निघाले. वाटेत इंग्लंडमधील मुक्कामात एका डच व्यापार्‍याने धर्मानंदांना कार्ल मार्क्स व समाजवादी तत्वज्ञान याची माहिती करून दिली. धर्मानंद त्याबद्दल अनभिज्ञ होते. पुढे अमेरिकेत पोहोल्यावर विविध लेखकांनी समाजवादावर लिहिलेले अनेक लेख व पुस्तके धर्मानंदांनी वाचली. जॉन स्पार्गो यांनी लिहीलेल्या कार्ल मार्क्स यांच्या चरित्राचा त्यांनी अभ्यास केला. हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर वारन यांच्या मृत्यूमुळे विशुद्धीमार्ग या बौद्ध ग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीच्या कामाची जबाबदारी प्रोफेसर ल्यानमन यांनी घेतली होती. धर्मानंदांनी त्यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली. परंतु, प्रो. ल्यानमन यांच्या आडमुठेपणामुळे विशुद्धीमार्गाचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. त्यामुळे अखेर दोन वर्षे अमेरिकेत काढून धर्मानंद भारतात परतले.

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More