दरम्यानच्या काळात धर्मानंदांनी कलकत्ता सोडून सिक्किमला भेट देण्याचे ठरवले. दक्षिणेप्रमाणे उत्तरेकडील बौद्धधर्माची माहिती मिळवण्याचा उद्देश या भेटीमागे होता. परंतु, सिक्कीममध्ये बौद्धधर्माविषयी कोणतीही माहिती त्यांच्या हाती लागली नाही. बौद्ध धर्माची लयाला गेलेलीच परिस्थिती त्यांना पाहावयास मिळाली. त्यामुळे ते कलकत्त्याला परतले.
![]() |
प्रा. धर्मानंद कोसंबी |
कलकत्त्यात रासबिहारी घोष, गुरुदास बॅनर्जी वगैरे मंडळींनी नॅशनल कॉलेज सुरू करण्याची योजना आखली होती. या कॉलेजच्या विषयपत्रिकेत पाली भाषेचा समावेश व्हावा असे धर्मानंदांना वाटत होते. यासाठी मनमोहन घोष यांच्या मदतीने त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. मनमोहन घोष यांनी धर्मानंदांची सत्येंद्रनाथ टागोर यांच्याशी भेट करवून दिली. धर्मानंदांच्या प्रयत्नांना यश आले. अगदी अखेरच्या क्षणी पाली भाषेचा कॉलेजच्या विषयपत्रिकेत समावेश करण्यात आला. धर्मानंदांना द्यावयाचा पगार मात्र फक्त ३० रुपये ठरविण्यात आला. पगाराची चिंता न करता काम करण्याची संधी मिळाली यामुळेच धर्मानंद जास्त खुश झाले. १५ ऑगस्ट १९०६ पासून म्हणजेच कॉलेज सुरू झाल्यापासून धर्मानंदांनी पाली भाषेचे अध्यापक म्हणून काम करण्यास सुरूवात केली.
अशा तर्हेने पाली भाषा शिकवणारे भारतातील पहिले केंद्र सुरू करण्यात धर्मानंदांना यश मिळाले. धर्मानंद आता प्रा. धर्मानंद कोसंबी झाले.
धर्मानंदांना घर सोडून तब्बल सात वर्षे झाली होती. १९०६ सालच्या ऑक्टोबर महिन्यातील दुर्गापूजेच्या सुट्टीत धर्मानंदांनी गोव्याला आपल्या घरी जाण्याचे ठरवले. प्रथम मुंबई व तिथून पुढे सरळ गोव्याला जाण्याचा त्यांचा विचार होता. मुंबईमध्ये त्यांची व डॉ. रा. गो. भांडारकर यांची भेट झाली. मुंबईत प्रार्थना समाजाचा वार्षिक उत्सव सुरू होता. डॉक्टरसाहेबांनी धर्मानंदांना प्रार्थना समाजातर्फे होणार्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात बुद्धचरित्र कथन करण्यास सांगितले. व्याख्यानाच्या वेळी उपस्थितांना धर्मानंदांची ओळख करून देताना डॉ. भांडारकरांनी पुण्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. एवढ्या चिकाटीने काम करण्याचे साहस धर्मानंदांच्या अंगी असेल याची आपणास कल्पना करता आली नसल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले.
धर्मानंद दोन दिवस मुंबईत राहिले व त्यानंतर गोव्याला सांखवाळीस गेले. धर्मानंद येत असल्याची बातमी तेथे आधीच पोहोचली होती. धर्मानंदांनी बंगाली पोषाख परिधान केलेला होता. त्यांना त्या पोषाखात पाहून त्यांच्या पत्नी बाळाबाईंनी एकदम रडायलाच सुरुवात केली. धर्मानंद कलकत्त्याला नोकरीला असल्यामुळे जास्त दिवस गावी राहू शकणार नव्हते. दुर्गापूजेची सुटी संपण्यापूर्वी त्यांना कलकत्त्याला जायचे होते. बाळाबाई त्यांच्यासोबत कलकत्त्याला यायला तयार झाल्या. परंतु, मुलगी धर्मानंदांच्या दाढीला बघून इतकी घाबरून गेली की ती बरोबर येण्यास तयार होईना. तेव्हा तिला चिखलीला आजीच्या घरी पाठवून धर्मानंद पत्नीबरोबर कलकत्त्याला आले. पण केवळ दोनच महिने कलकत्त्यात राहिल्यावर बाळाबाईंची तब्येत बिघडली. त्यामुळे धर्मानंदांनी त्यांना पुन्हा गोव्यास पोहोचवले.
३१ जुलै १९०७ रोजी गोवा येथे बाळाबाईंनी एका मुलास जन्म दिला. घरातील थोरल्या मुलास आजोबाचे नाव ठेवायची त्या काळी प्रथा होती. त्यानुसार मुलाचे नाव ‘दामोदर’ ठेवण्यात आले होते. याच महिन्यात धर्मानंदांची कलकत्ता विद्यापीठात पाली भाषेचे व्याख्याते म्हणून नेमणूक झाली. दरमहा १०० रुपये पगार ठरला. "मी विद्यापीठात काम करू लागलो तरी नॅशनल कॉलेजचा संबंध सोडणार नाही" असे त्यांनी कुलगुरू आशुतोष मुखर्जी यांना सांगितले व त्यांनीही हरकत घेतली नाही. कलकत्ता विद्यापीठात नोकरी मिळाल्याने धर्मानंदांना बर्यापैकी पैसे मिळू लागले. त्यामुळे ते नॅशनल कॉलेजचे काम विनावेतन करू लागले. कलकत्त्यात असेपर्यंत त्यांनी ते काम सोडले नाही.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’