Wednesday, July 03, 2024

नशिबाची पुनःपुन्हा हुलकावणी

कोणताही सांघिक खेळ असो चांगला संघ तयार होण्यासाठी कित्येक वर्षे जावी लागतात. सातत्य राखावे लागते. अविरत कष्ट करावे लागतात. हे पाहता दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने उत्तम क्रिकेट खेळत आलेला आहे. क्रिकेट जगतात दक्षिण आफ्रिका हे नाव जरी उच्चारले तरी खेळाबरोबरच वागणूक आणि वर्तणूकीनेही उत्तम असा एक संघ आपल्या डोळ्यासमोर येतो. क्रिकेट या खेळाला जंटलमन्स गेम का म्हणतात हे दक्षिण आफ्रिका संघाकडे पाहून समजते.

T20WC2024 फायनलमध्ये पराभवाचा धक्का
बसलेले दक्षिण आफ्रिकन खेळाडू

आयसीसीकडून 1998 साली बांग्लादेशमध्ये 'आयसीसी नॉकआउट ट्रॉफी' किंवा अधिकृत नाव 'विल्स इंटरनॅशनल कप' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवून नॉकआउट ट्रॉफीवर आपले नाव कोरले. याच ट्रॉफीला पुढे चॅम्पियन्स ट्रॉफी या नावाने ओळखले जाऊ लागले. चॅम्पियन्स ट्रॉफीला 'मिनी वर्ल्ड कप' असेही संबोधतात. क्रिकेट जगतात ही ट्रॉफी महत्त्वाची समजली जाते. गेल्या 25-30 वर्षांमध्ये अत्यंत दर्जेदार क्रिकेट खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या नावावर चॅम्पियन्स ट्रॉफी हे एकमेव यश जमा आहे. कुठल्याही प्रकारातला एकही विश्वचषक जिंकण्यात अद्यापतरी त्यांना यश आलेले नाही.

Thursday, July 22, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ⑩

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची वाई येथे ब्राम्हधर्मप्रसार करण्याची इच्छा होती. ४ जुलै १९३३ रोजी वाई येथे प्रार्थनासंघाची स्थापना करण्यात आली. तिच्या अध्यक्षपदी नारायणराव चव्हाण व सेक्रेटरीपदी रामराव बाबर यांची निवड करण्यात आली. दर रविवारी चित्तशुद्धीसाठी सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना करायचे ठरले. अशा मंडळास प्रार्थनासंघ असे नाव देण्यात आले होते. पुढे याच वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात राजा राममोहन रॉय सांवत्स‍रिक पुण्यतिथीच्या निमित्ताने विठ्ठल रामजी शिंदे यांनी एक दौरा काढला होता. त्याची सुरुवात त्यांनी वाई येथून करण्याचे ठरवले होते. वाई प्रार्थनासमाजाचे काम पाहावे त्याचबरोबर सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे या उद्देशाने १४ नोव्हेंबर रोजी विठ्ठलराव यांनी भगिनी जनाक्का शिंदे, बी. बी. केसकर, गणपतराव शिंदे यांच्यासमवेत रामराव बाबर यांच्या घरी भेट दिली.

भगिनी जनाक्का शिंदे

दोन वर्षांनी १९३५ च्या मे महिन्यात विठ्ठल रामजी शिंदे हे भगिनी जनाक्का, यज्ञेश्वरपंत भांडारकर यांच्यासमवेत वाईस आले. बुद्धपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी गणपती घाट येथे बुद्धाच्या जीवनावर एक व्याख्यान दिले. या दौऱ्यात प्रार्थनासंघासाठी वाईत जागेची सोय झाली. वाई येथे प्रार्थनासमाजाच्या स्थापनेमुळे विठ्ठलराव खूप समाधानी झाले. वाई व आजूबाजूच्या गावांमध्ये जाताना विठ्ठलरावांच्या बरोबर भगिनी जनाक्का, बाबर कुटुंबीय, नारायणराव चव्हाण कुटुंबीय असत.

Thursday, July 15, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ⑨

विठ्ठल रामजी शिंदे यांचे डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम जोमाने सुरू होते. त्यासाठी त्यांना वेळही द्यावा लागत होता. या व इतर काही कारणांमुळे प्रार्थनासमाजातील काही मोठी मंडळी त्यांच्यावर नाराज होती. त्यामुळे नोव्हेंबर १९१० रोजी मुंबईत प्रार्थनासमाजाने एक ठराव करून विठ्ठल रामजी शिंदे यांना प्रचारक म्हणून चक्क काढून टाकले.

सलग ७ वर्षे विठ्ठलरावांनी अगदी निष्ठेने प्रचारकाचे काम केल्यानंतर त्यांचे प्रार्थनासमाजाशी असलेले नाते आता संपले होते. असे असले तरी त्यांनी धर्मप्रसार हे जीवनकार्य म्हणून स्वीकारले होते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या असतानाही मोठ्या हिमतीने त्यांनी अजून दोन वर्षे मुंबईत काढली. त्यानंतर आर्थिक अडचणी, मुंबईत जागेचा प्रश्न व अशा अनेक कारणांमुळे त्यांनी आपल्या मिशनचे कार्यालय पुण्यास हलवले.

भगिनी जनाक्का शिंदे

भगिनी जनाक्कांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने ज्या निराश्रित सेवासदनाची जबाबदारी पार पाडली ते सदन आर्थिक मदत बंद झाल्याने बंद करावे लागले होते. त्यामुळे त्यांना वऱ्हाड आणि मध्यप्रांताची परिस्थिती पाहण्यासाठी तिकडे पाठवण्यात आले. त्या यवतमाळ येथे एक छोटे वसतिगृह सुरू करून चालवू लागल्या.

Friday, July 09, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ⑧

विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी मुंबई येथे ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ अर्थात ‘भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी’ ही संस्था अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासाठी व अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी स्थापन केली. मिशनच्या अध्यक्षपदी सर नारायण चंदावरकर, उपाध्यक्षपदी शेठ दामोदरदास सुखडवाला, खजीनदार नारायणराव पंडित तर मिशनच्या जनरल सेक्रेटरीपदी स्वतः विठ्ठल रामजी शिंदे राहिले. मिशनच्या कामासाठी विठ्ठलरावांनी आपल्या बहिणीला जनाक्कांना पनवेलवरून मुंबईस बोलवून घेतले. मिशनच्या कामात सहभागी होण्यासाठी त्यांनी पनवेलच्या शाळेतील मुख्याध्यापिका या पदाचा राजीनामा दिला होता. प्रार्थनासमाजाची कामे जसे की भजन करणे, गोरगरिबांची विचारपूस करणे अशी कामे त्या पूर्वीही करत असत. विठ्ठलरावांनी जनाक्कांना मिशनची कार्यवाह म्हणून नेमले. त्यांचे आई-वडीलही मिशनच्या कामात सहभागी झाले.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

मिशनचे काम जोमाने सुरू झाले होते. दर शनिवारी व्याख्याने व कीर्तने होत. रविवारी सकाळी धर्मशिक्षणाचे वर्ग व सायंकाळी उपासना चाले. विठ्ठलराव स्वतः व भगिनी जनाक्का ही कामे करत. पाहता पाहता सर्वत्र मिशनचीच चर्चा होऊ लागली. वर्तमानपत्रांनीही दखल घेऊन ते मिशनच्या कार्याबद्दल छापू लागले.

Wednesday, June 30, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ⑦

१९०० साली वासुदेवराव सुखटणकर यांनी आपल्या कुटुंबियांना काही दिवस जमखंडीस ठेवले होते. त्यावेळी त्यांची बहीण शांता हिला क्षयाची बाधा झाली होती. त्यावेळी चंद्राक्काही तिची सेवा करत असल्यामुळे त्यांनाही क्षयाची बाधा झाली. त्यांना हवापालटासाठी म्हणून खंडाळा, अहमदनगर अशा ठिकाणी नेले परंतु काही फरक पडला नाही. अखेर ३ फेब्रुवारी १९०७ रोजी चंद्राक्का निर्वतल्या.

भगिनी जनाक्का शिंदे

जनाक्का हुजुरपागेत सहावीत होत्या. त्या अचानक आजारी पडल्या. खोकून बेजार झाल्या होत्या. त्यावेळी चंद्राक्का नुकत्याच निर्वतल्या होत्या. शांता सुखटणकरशी जनाक्कांचाही संपर्क आल्याने त्यांनाही क्षयाची बाधा झाली असल्याची शंका व भीती निर्माण झाली. परंतु डॉक्टरांनी निदान केल्यानंतर त्यांना क्षयाची नसून प्लुरसीची बाधा झाल्याचे समजले. या आजारात जनाक्कांना तीन महीने अंथरूणात राहावे लागले. परीक्षा जवळ आली होती. व्यवस्थित परीक्षा पास झालो नाही तर शिष्यवृत्ती बंद होईल या भीतीने जनाक्कांनी आजारपणात तसाच अभ्यास केला व सहावीची परीक्षा त्या उत्तमरीत्या पास झाल्या. पण काही दिवसांनी त्या पुन्हा आजारी पडल्या. आईवडील व बंधू विठ्ठलराव नको म्हणत असतानाही त्यांनी मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश घेतला. वाडिया डॉक्टरांनी जनाक्कांची फुफ्फुसे कमजोर झाली असून त्यांना विश्रांतीची नितांत आवश्यकता असल्याने अशा परिस्थितीत त्यांना अभ्यास करू देणे योग्य होणार नाही असे सांगितले. डॉक्टर मोदी यांनी तर जनाक्कांची शाळा बंद करण्याचा सल्ला दिला.

Sunday, June 13, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ⑥

विठ्ठलरावांनी आपल्या इतर दोन बहिणी तान्याक्का व चंद्राक्का यांनाही हुजुरपागेत शिक्षणासाठी ठेवले होते तर त्यांचे धाकटे बंधू एकनाथराव हे विठ्ठलरावांचे मित्र गोविंदराव सासने यांच्याकडे कोल्हापुरात शिक्षण घेत होते.

विठ्ठल रामजी शिंदे हे विलायतेत धर्मशिक्षण घेऊन ६ ऑक्टोबर १९०३ रोजी मुंबईत दाखल झाले.

विलायतेहून आल्यावर विठ्ठलरावांनी धर्मप्रचाराच्या कार्याला सुरुवात केली. १५ नोहेंबर १९०३ रोजी न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत प्रार्थनासमाजाची सभा भरून सभेत सर्वानुमते विठ्ठल रामजी शिंदे यांना प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून नेमण्यात आले.

भगिनी जनाक्का शिंदे

धर्मप्रचाराच्या कार्यासाठी विठ्ठलरावांचे अनेक ठिकाणी दौरे होत होते. एके दिवशी विठ्ठलराव धर्मप्रचारासाठी आपल्या गावी जमखंडी येथे पोहोचले. विठ्ठलरावांच्या घरी पूर्वीपासूनच धार्मिक वातावरण होते. त्यांच्या घरी त्यांचे आईवडील ब्राम्होपासना करत असत. विठ्ठलरावांनी गावात व्याख्यानमाला भरवली होती. परंतु गावातील जुन्या विचाराच्या लोकांना नवे सुधारकी विचार पचनी पडेनात. हळूहळू त्यांचा विरोध वाढू लागला. गावातले वातावरण चिघळून त्याला काहीसे हिंसक रूप प्राप्त झाले. रात्रीच्या वेळी दंगलीचा एक मोर्चा रामजीबाबांच्या घराच्या दिशेने आला. याचा इतका गंभीर परिणाम झाला की विठ्ठलरावांनी आपल्या कुटुंबीयांसह गावच सोडण्याचे ठरवले. त्यावेळी जनाक्का व चंद्राक्का या जमखंडीतच होत्या. त्या पुण्याला शिक्षणास असल्याने त्यांना पुण्यात सोडून विठ्ठलराव इतर कुटुंबियांसह १९०४ च्या पावसाळ्यात मुंबईस आले. प्रार्थनासमाजाच्या राममोहन आश्रमात विठ्ठलरावांच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली.

Tuesday, June 01, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ⑤

विठ्ठलराव व रुक्मिणीबाई यांना ९ सप्टेंबर १९०१ रोजी अपत्य झाले. मुलाचे नाव प्रताप असे ठेवण्यात आले. प्रतापच्या जन्मानंतर काहीच दिवसांनी विठ्ठलराव विलायतेस जाण्यासाठी निघणार होते. ते २१ सप्टेंबर १९०१ रोजी मुंबई येथून इंग्लंडला रवाना झाले. त्यांना सोडण्यासाठी त्यांचे आई-वडील, धाकटे बंधू एकनाथराव व बहीण जनाक्का इत्यादी कुटुंबीय मुंबईस गेले.

तरुण वयातील विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठलराव विलायतेस शिक्षणासाठी गेले असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत विठ्ठलरावांचे कोल्हापूरचे मित्र गोविंदराव सासने व वासुदेवराव सुखटणकर हे जनाक्कांच्या शाळेत वेळोवेळी येऊन विचारपूस करून जात.

Sunday, May 30, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ④

शिक्षण घेत असताना एकीकडे जनाक्का येणाऱ्या अडचणींचा सामना तर करतच होत्या परंतु दुसरीकडे त्यांना शाळेत एका नव्या जीवनपद्धतीचा परिचयही होत होता. हुजुरपागेतील शिक्षिका या आपले काम अतिशय निष्ठापूर्वक करणाऱ्या होत्या. मिस् हरफर्ड या मुलींचा व्यायाम व्हावा या उद्देशाने त्यांना विविध खेळ खेळायला लावत. मुलींना प्रोत्साहित करण्यासाठी अनेकदा त्या स्वतःही खेळात भाग घेत. त्यांना स्वच्छता टापटीप आधुनिक पाश्चात्य पद्धतीची आवड होती. मुलींनीही तसेच स्वच्छ टापटीप वागावे अशी त्यांची अपेक्षा असे.

भगिनी जनाक्का शिंदे

१८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली. विठ्ठलरावांना सर्वांना घेऊन काही काळ जमखंडीस जाणे भाग पडले.

हुजुरपागेत जनाक्कांना अनेक मैत्रिणी मिळाल्या. अनेक दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य परतले होते. जनाक्का या मोकळ्या स्वभावाच्या होत्या. मनाने त्या खूप मोठ्या होत्या. त्यांच्यात एक प्रकारचा सेवाभावही वसत होता.

Wednesday, May 12, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ③

विठ्ठलराव पुण्यास शिक्षण घेत होते. जनाक्कांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले होते. बहिणीस तिच्या पायावर उभे करावे. तिची पुढील शिक्षणाची व्यवस्था करावी या उद्देशाने १८९५ साली ते जनाक्कांना घेऊन पुण्यास आले. सोबतीला आई यमुनाबाईही होत्या. पुण्यात ते सदाशिव पेठेतील नागनाथ पारजवळील पालकर यांच्या वाड्यात राहू लागले.

भगिनी जनाक्का शिंदे

पुण्यात जनाक्कांची शिक्षणाची सोय करणे आवश्यक होते. आपल्या बहिणीने खूप शिक्षण घ्यावे व स्वावलंबी व्हावे असे विठ्ठलरावांना वाटत होते. त्यांनी सुरुवातीला जनाक्कांना चिमण्या गणपतीजवळील अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी शाळेमध्ये घातले. मात्र विद्यार्थिनींना ख्रिश्चन धर्मात ओढण्याचा संस्थाचालकांचा डाव वेळीच लक्षात आल्याने त्यांनी सहाच महिन्यात जनाक्कांचे नाव त्या शाळेतून काढून घेतले.

Sunday, March 21, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ②

जनाक्कांची वयाची १२ वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळच्या प्रथेनुसार त्यांची सासरी पाठवणूक करण्यात आली. सासरी गेल्यानंतर मात्र चौथीपर्यंतचे शिक्षण झालेल्या व वाचनाची आवड निर्माण झालेल्या जनाक्कांना वाचनासाठी काहीच मिळेना. त्यांचा काहीसा हिरमोड झाला. आपण आता माहेरी नाही आहोत याची जाणीव त्यांना झाली.

एकदा जनाक्का आपल्या नणंदांसमवेत पाणी भरण्यासाठी गेल्या असताना रस्त्यामध्ये त्यांना एक सरकारी कागदाचा तुकडा सापडला. घरी आल्यावर त्या जेव्हा तो कागद वाचू लागल्या तेव्हा तिच्या नणंदा मोठ्या उत्सुकतेने त्या कसे वाचतात ते पाहू लागल्या. गोपाळरावांचेही लक्ष होते. आपली सून सरकारी कागद वाचू शकते हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. इथून पुढे दिवाणजींची गरज नसून घरचा सगळा हिसाबकिताब आपली सूनच पाहील असे त्यांनी ठरवले. घरातील सर्व मंडळी जनाक्कांचे कौतुक करू लागली.

भगिनी जनाक्का शिंदे

सासरी जनाक्कांवर सर्वजण खुश असले तरी त्यांचे पती कृष्णराव मात्र अत्यंत नाखूश होते. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड नसल्याने त्यांनी शिक्षण घेतले नव्हते. त्यामुळे एकीकडे शिक्षण घेतले नाही म्हणून त्यांना पहिल्यापासूनच वडिलांची सतत बोलणी खावी लागत असत तर दुसरीकडे शिकलेली बायको हा मित्रमंडळींमध्ये त्यांच्या थट्टेचा विषय झाला होता. त्यात शिकलेल्या बायकोचे कौतुक सतत कानावर येत होते. त्यामुळे कृष्णरावांच्या मनात बायकोबद्दल अढी निर्माण होऊन दिवसेंदिवस त्यांचा तिच्याबद्दलचा राग वाढू लागला.

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More