१९०० साली वासुदेवराव सुखटणकर यांनी आपल्या कुटुंबियांना काही दिवस जमखंडीस ठेवले होते. त्यावेळी त्यांची बहीण शांता हिला क्षयाची बाधा झाली होती. त्यावेळी चंद्राक्काही तिची सेवा करत असल्यामुळे त्यांनाही क्षयाची बाधा झाली. त्यांना हवापालटासाठी म्हणून खंडाळा, अहमदनगर अशा ठिकाणी नेले परंतु काही फरक पडला नाही. अखेर ३ फेब्रुवारी १९०७ रोजी चंद्राक्का निर्वतल्या.
![]() |
भगिनी जनाक्का शिंदे |
जनाक्का हुजुरपागेत सहावीत होत्या. त्या अचानक आजारी पडल्या. खोकून बेजार झाल्या होत्या. त्यावेळी चंद्राक्का नुकत्याच निर्वतल्या होत्या. शांता सुखटणकरशी जनाक्कांचाही संपर्क आल्याने त्यांनाही क्षयाची बाधा झाली असल्याची शंका व भीती निर्माण झाली. परंतु डॉक्टरांनी निदान केल्यानंतर त्यांना क्षयाची नसून प्लुरसीची बाधा झाल्याचे समजले. या आजारात जनाक्कांना तीन महीने अंथरूणात राहावे लागले. परीक्षा जवळ आली होती. व्यवस्थित परीक्षा पास झालो नाही तर शिष्यवृत्ती बंद होईल या भीतीने जनाक्कांनी आजारपणात तसाच अभ्यास केला व सहावीची परीक्षा त्या उत्तमरीत्या पास झाल्या. पण काही दिवसांनी त्या पुन्हा आजारी पडल्या. आईवडील व बंधू विठ्ठलराव नको म्हणत असतानाही त्यांनी मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश घेतला. वाडिया डॉक्टरांनी जनाक्कांची फुफ्फुसे कमजोर झाली असून त्यांना विश्रांतीची नितांत आवश्यकता असल्याने अशा परिस्थितीत त्यांना अभ्यास करू देणे योग्य होणार नाही असे सांगितले. डॉक्टर मोदी यांनी तर जनाक्कांची शाळा बंद करण्याचा सल्ला दिला.